Wednesday, January 11, 2017

मोठ्या मनाचा माणूस!


आठ वर्षांपूर्वी जेव्हा ते निवडून आले तो दिवस आणि आजचा दिवस, जगातील सर्वात ताकदवान राष्ट्राच्या अध्यक्षपदी निवड झाली असतानाही आणि त्या पदावरून सन्मानपूर्वक पायउतार होताना चेह-यावर कसलाही अभिनिवेश नाही किंवा आपणच कसे तारणहार होतो याच्या बढाया नाहीत. किती मोठ्या मनाचा माणूस, ज्याला आपलं म्हणणं मांडण्यासाठी आपल्या कार्यकाळात कसलाही आरडाओरडा करावा लागला नाही आणि अभिनय तर अजिबातच नाही. म्हणूनच तुम्ही मला चांगला अध्यक्ष आणि माणूस बनवलात ही त्यांनी दिलेली प्रांजळ कबुली तितकीच खरी वाटते.
ओबामा ख-या अर्थाने जागतिक नेते आहेत याचा प्रत्यय पुन्हा एकदा त्यांच्या निरोपाच्या भाषणातून आला. मुलगा, नवरा, बाप, पालक, कायदेतज्ञ, अॅक्टिव्हिस्ट, वक्ता, राजकारणी आणि अध्यक्ष ज्याने बदल (CHANGE) आणि आशा (HOPE) या शब्दांची जगाला नव्याने ओळख करून दिली. जे बोलले तसंच शेवटपर्यंत वागले. आपल्या राजकीय कारकिर्दीचा हिशेब मांडताना त्यांनी कसलीच आकडेवारी दिली नाही, योजनांची जंत्री मांडली नाही, कुणावर आरोप केले नाहीत किंवा आता देशाचे कसे होणार याबाबत चिंता व्यक्त केली नाही. ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्याचा उल्लेखही अत्यंत शांतपणाने. देश म्हणून आपण सतत बदलत राहण्याचं धाडस दाखवलं असं नमूद करताना आता आता देखिल एका अध्यक्षाकडून दुस-याच्या हातात अत्यंत सहजपणे ही जबाबदारी हस्तांतरीत झाली पाहिजे ह्या प्रगल्भ मानसिकतेचं कौतुक करावं तेवढं कमीच. भविष्य हे आपलं असलं पाहिजे आणि हे शक्य आहॆ केवळ लोकशाही व्यवस्थित काम करत असेल तरच, याची जाण ते पुन्हा पुन्हा करून देत होते. सार्वजनिक आरोग्याबाबत आम्ही जे काम केलं त्यापेक्षा इतर कुणी चांगलं करून दाखवलं तर त्याला व्यक्तिश: माझा पूर्ण पाठिंबा असेल, यासाठी खूप मोठं मन लागतं.
विस्थापितांबद्दल आकस बाळगण्यापेक्षा आपल्या विविधतेचं ते एक प्रमुख अंग आहेत, हे त्यांचं विधानदेखिल अनुकरणीयच. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची समाजाची दृष्टी बदलण्यासाठी अनेक पिढ्या जाव्या लागतात तो संयम बाळगणे आवश्यक आहॆ. राजकारण हे अनेक कल्पनांचं युध्द आहॆ पण आपले संविधान ही आपल्याला मिळालेली अतिशय सुंदर देणगी आहे, तिचा कायम आदर करा आणि ते अग्रस्थानी ठेवण्याचा सल्लाही तितकाच मोलाचा. फक्त निवडणुकीपूर्ती नाही तर आयुष्यभरासाठी लोकशाहीला तुमची गरज आहे, हे कायम स्मरणात ठेवायलाही ते विसरले नाहीत. देशातील प्रत्येक नागरिकाने फक्त मलाच नाही तर या देशाला अभिमान वाटावं अशी कामगिरी केली आहॆ. त्यामुळे या देशाचं भविष्य चांगल्या लोकांच्या हातात असल्याचा विश्वास मला आहे, हा आशावादही त्यांनी दिला. उपराष्ट्राध्यक्षाचा उल्लेख करायला ते विसरले नाहीत.
अध्यक्ष असूनही त्यांनी कधीच 'मी'चा बाऊ केला नाही, मिशेल यांचा उल्लेख आवर्जुन येतच असे. इथेही तो आला आणि तो उल्लेख करताना ते गहिवरलेही. आपल्या पोरींचीही त्यांनी अध्यक्ष म्हणून नाही तर एक अभिमानी बाप म्हणून दखल घेतली. साधारण पाऊण तास चाललेल्या भाषणामध्ये कुठेही किचकट होणे त्यांनी टाळले. अतिशय सोप्या शब्दांमध्ये निरोपाचं भाषण करताना आपण जगातील सर्वात शक्तिशाली पदावरून पायउतार होतोय याची त्यांच्या वागण्या, बोलण्यात किंवा चेह-यावर यत्किंचित खंत दिसत नव्हती. सूर्याने उगवावे आणि आपले काम करून वेळेत परत निघून जावे पुन्हा तितक्याच तेजाने उगवण्यासाठी. बराक हुसैन ओबामा यांची एक्झिटही अशीच म्हणायला हवी. 

Saturday, April 16, 2016

खाऊखुशाल : ताज आईस्क्रीम - सव्वाशे वर्षांची गारेगार परंपरा

घरात एखादा पदार्थ तयार करताना तो पुढच्यावेळी त्याच चवीचा तयार होईल याची आपण खात्री देऊ शकत नाही. परंतु, गेली १२५ वर्षे जर कोणी दररोज त्याच चवीचा पदार्थ तयार करत असेल तर त्याला दाद तर द्यायलाच हवी पण त्यांच्या सातत्याचं कौतुकही करणं तितकंच महत्त्वाचं आहे. सध्या तापमानाचा पारा वेगवेगळे विक्रम प्रस्थापित करतोय. तेव्हा तुम्ही उन्हात फिरत असताना सतत काहीतरी थंड पदार्थ खाण्याची किंवा पिण्याची गरज वाटते. अशावेळी तुम्ही बोहरी मोहल्ला परिसरात असाल तर थोडी वाट वाकडी करून 'ताज आईस्क्रीम'ला जरूर भेट देऊन अतिशय माफक दरात तिथल्या ताज्या फळांच्या आईस्क्रीमचा आस्वाद लुटू शकता. कुटुंबाचा पूर्वापार चालत आलेला हा व्यवसाय सध्या हातिमभाई तितक्याच आपुलकीने आणि तडफेने करत आहेत. गेल्या सव्वाशे वर्षांमध्ये आईस्क्रीम तयार करण्याच्या पद्धतीत आजवर कोणताच फरक पडलेला नाही हे विशेष.

बाजारात जी ताजी फळं उपलब्ध आहेत त्याच फळांचं आईस्क्रीम येथे तयार केलं जातं. आज त्यांच्याकडे हापूस आंबा, सीताफळ, स्ट्रॉबेरी, केसर पिस्ता, पेरू, टेंडर कोकोनट, चोको चिप्स हे फ्लेवर्स मिळतात. त्याचप्रमाणे पान पसंद, मोसंबी, संत्र, किलगड, मस्कमेलन हे फ्लेवर्स ऑर्डरप्रमाणे तयार केले जातात. आंबा आईस्क्रीमसाठी केवळ हापूस आंब्याचाच वापर केला जातो आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर्ससाठी स्ट्रॉबेरी थेट महाबळेश्वरहून मागवल्या जातात. टेंडर कोकोनट म्हणजे शहाळ्याच्या आईस्क्रीमसाठी केवळ जाड मलई वापरली जाते आणि त्यात श्रीलंकन कोकोनट पावडरचा वापर करण्यात येतो. मुख्य म्हणजे आइस्क्रीम तयार करण्यासाठी पूर्ण सायीच्या ताज्या दुधाचाच वापर केला जातो. म्हणूनच की काय प्रत्येक घास स्वर्गसुखाची अनुभूती देतो आणि फळांचे फ्लेवर्स केवळ नावापुरते राहत नाहीत.

येथे आईस्क्रीम लिटरने नाही तर किलोने विकलं जातं. सर्व फ्लेवर्सची एकच किंमत असून कपमध्ये ६० रुपयांना १०० ग्रॅम आईस्क्रीम दिलं जातं. ४०० ते ६०० रुपये असा किलोचा भाव आहे. एखादा फ्लेवर संपला तर मागणीनुसार तो ३० मिनिटांमध्ये तयार केला जातो. इतके येथील कामगार सरावलेले आहेत. हातिमभाई म्हणाले आम्ही सरसकट कुठल्याही कॅटर्सला आईस्क्रीम विकत नाही. जे चांगली किंमत मोजायला तयार असतील आणि ज्यांना चांगल्या प्रतीचं आइस्क्रीम खायचं आहे त्यांनाच आम्ही आइस्क्रीम विकतो. दादर, कुलाबा, माझगांव, भायखळा अशा आठ ते दहा किलोमीटर घरपोच सुविधाही दिली जाते.

शहरातील एका कोपऱ्यात इतकी र्वष यशस्वीपणे चांगल्या दर्जाच्या पदार्थाचा आस्वाद देणाऱ्या पहिल्या पाच जागांमध्ये ताज आईस्क्रीमचा समावेश होतो, असंही हातिमभाई यांनी सांगितलं. म्हणूनच की काय, झोमॅटो या पदार्थाना रेटिंग देणाऱ्या संकेतस्थळाने ताज आईस्क्रीमला चक्क पाचपकी ४.९ स्टार दिले आहेत. शहरातील अनेक टूर्स कंपन्या मुंबईतील महत्त्वाच्या जुन्या जागा आणि प्रसिद्ध पदार्थाची माहिती देताना आपल्या खास परदेशी पाहुण्यांना आईस्क्रीमची चव चाखण्यासाठी ताज आईस्क्रीमला घेऊन जातात. ज्याप्रमाणे हातिमभाईंचा हा कौटुंबिक व्यवसाय आहे, त्याप्रमाणे त्यांच्याकडे काम करणाऱ्या लोकांचीसुद्धा ही दुसरी पिढी आहे. त्यांचीसुद्धा ते तितकीच काळजी घेतात. त्या प्रेमाची चवसुद्धा बहुदा या आईस्क्रीममध्ये उतरते. त्या पद्धतीसोबत त्याचं आणखीही एक गुपित आहे. चवीचं आणखी एक गुपित म्हणजे, बेल्जियम क्वालिटीच्या तांब्याच्या भांडय़ामध्ये येथे आईस्क्रीम तयार करण्यात येतं. एवढंच नाही तर हातिमभाईंचं कुटुंब गेली कित्येक वर्षे या भांडय़ांची खरेदी मोहम्मद अली रोडवरील फैझुल्लाभाई तांबावाला आणि एच.ए.तांबावाला यांच्याकडूनच करतात.

एकावेळी वीस लोकं बसून आईस्क्रीमचा आनंद लुटू शकतील, अशी टेबल-खुच्र्याची रचना करण्यात आलेली आहे. आईस्क्रीमसोबत आता कुल्फी रोलसुद्धा येथे मिळतात. ऑर्डर दिल्यानंतर कुठल्याही विलंबाशिवाय अतिशय प्रेमाने हातिमभाई आलेल्या ग्राहकांना आईस्क्रीम खाऊ घालतात. म्हणूनच हातिमभाई म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही मनापासून एखादा व्यवसाय केलात तर केवळ तो व्यवसाय करणारी माणसं म्हातारी होतात, पण तो व्यवसाय मात्र तरुणच राहतो. ताज आईस्क्रीमच्या कुठल्याही फ्लेवर्सची चव चाखताना हे आवर्जून ध्यानात येतं.

आईस्क्रीम तयार करण्याची पद्धत
सर्वात प्रथम दररोज जवळपास ८० ते १०० लिटर दूध मोठय़ा भांडय़ामध्ये एकत्र तापवलं जातं. चांगलं उकळलेलं दूध पूर्णपणे थंड केलं जातं. त्यानंतर त्यामध्ये दुधाच्या व साखरेच्या ठरलेल्या प्रमाणाप्रमाणे साखर टाकली जाते. साखर नीट विरघळल्यानंतर ते दूध फ्रीजमध्ये ठेवण्यात येतं. आणि त्यानंतर ते गरजेप्रमाणे बाहेर काढून वापरलं जातं. पुढील प्रक्रिया करण्यासाठी सर्व ताजी फळे वापरण्यात येतात. त्यांचा गर काढून तो व्यवस्थित क्रश केला जातो. स्ट्रॉबेरी, अननस या फळांना थोडं शिजवलंही जातं. दूध, फळांचा क्रश आणि आवश्यक इतर साहित्याचे सुयोग्य मिश्रण करून आईस्क्रीम तयार करण्यात येते.

* पत्ता : ताज आईस्क्रीम : खारा टँक रोड, बोहरी मोहल्ला, भेंडी बाजार, भायखळा 
* वेळ – स. १० ते रात्री १२ वाजेपर्यंत.

हा लेख लोकसत्ता संकेतस्थळावर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Sunday, November 16, 2014

'एलिझाबेथ एकादशी' : 'टीकाऊ'पणाचं अफलातून लॉजिक

'एलिझाबेथ एकादशी' हा परेश मोकाशी दिग्दर्शित चित्रपट, तो पाहण्याआधी आणि पाहिल्यानंतर स्व:कडे आकर्षित करण्याच्या साध्या ग्रँव्हिटीच्या नियमामध्ये कमालीचा चपखल बसतो. खुद्द पंढपुरात फक्त चार दिवसांमध्ये घडणारी एक सरळ साधी गोष्ट. पण ती मांडताना दिग्दर्शकाने केलेले आजच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि बौध्दीक व्यवस्थेचे चित्रण केवळ लाजवाबच म्हणता येईल.
रूप-रंग, श्रीमंती, व्यवसाय या सर्वच पातळीवर आबाळं असलेला परंतु तरीही देव म्हणवला गेलेला असा विठ्ठल हा सामांन्याचे श्रध्दास्थान. तीच बाब सायकलची. त्यामुळे या दोघांना केंद्रस्थानी ठेवून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. प्रेक्षकांना मुर्ख न समजता त्यांच्या विचारक्षमतेला आव्हान देत, संवेदनशीलतेचा ठाव घेत आणि निखळ मनोरंजन करतानाही आजच्या सामाजिक प्रश्नांची मांडणी करत हा चित्रपट सुरू होतो आणि संपतो. परंतु, विशेष म्हणजे चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावरही विचार करायला भाग पाडत राहतो.
पंढरपूर आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने येणारा उत्सव, लोकांची श्रध्दा, संत साहित्य, परंपरा, तेथील जनजीवन, राहणीमान, लोकांचे स्वभाव ह्या सर्व गोष्ठी चित्रपटात आहेतच. पण त्याचबरोबरीने शिक्षण (शिष्यवृत्ती परीक्षा), विज्ञान (न्यूटनला देव्हा-यात स्थान ), सरकारी कायदे , सेक्सच्या (उत्सवाच्या काळात चालणारा वेश्याव्यवसाय) पातळीवर टँबू मानल्या गेलेल्या गोष्टी दिग्दर्शकाने इतक्या सहजसुंदरपणे यामध्ये गुंफल्या आहेत त्याला तोड नाही. त्यामध्येही वैचारिक खाद्याची आस असलेल्यांना ते आणि केवळ मनोरंजन हवं असणा-यांना ते या चित्रपटातून एकाच वेळी पुरेपूर मिळतं हे विशेष.
आई-मुलं, सासू -सून आणि आजी-नातवंड यांच्यातील नातं खूप गोड पध्दतीनं यामध्ये दाखवण्यात आलंय. मुलांचे स्वभाव आणि मैत्री दाखवताना त्यामधील सहजता जपण्यात आली आहे. नवरा गेल्यावर स्वेटर तयार करून, जेवणं बनवून मुलांच्या शिक्षणासाठी चाललेली आईची दगदग, बँकेचे कर्ज फेडण्यासाठी पाच हजार जमवण्यासाठी चाललेली धडपड, घराच्या मालकिणीचा व्यवहारीपणा आणि चांगुलपणा, गावातील आणि गावाबाहेरून आलेल्या व्यक्तींच्या स्वभावातले बारकावे दिग्दर्शकाने इतक्या सहजपणे पकडले आहेत की ती मंडळी पडद्यावर अभिनय करतायत असे वाटतंच नाही.
चित्रपटातील संवाद ही सर्वात जमेची बाजू. ते लहान मुलांच्या तोंडी देतानाही उपदेशपर वाटणार नाहीत आणि त्यांनी केलेले विनोद सर्व वयोगटातील लोकांना आपलेसे वाटतील याची खबरदारी घेण्यात आली आहे. किर्तनांचा आणि गोष्टींचा केलेला वापर जबरदस्त. या चित्रपटातील एकमेव गाणं हे श्रवणीय तर आहेच पण त्याहीपलिकडे त्या गाण्यातून आजच्या समाजजीवनावर केलेलं टोकेरी भाष्य अफलातूनच म्हणावं लागेल. इग्लंडची राणी एलिझाबेथ ही बराच काळ टिकली. त्यामुळे 'एलिझाबेथ' म्हणजे 'टीकाऊ' आणि म्हणूनच सायकलचं नाव एलिझाबेथ. हे 'टीकाऊ'पणाचं लॉजिक अनेकअर्थांनी या सिनेमालाही तंतोतंत लागू पडतं.
चित्रपटाची कथा कशी पुढे सरकते हे पडद्यावर बघण्यात आणि संवाद पात्रांच्या तोंडून ऐकण्यात मजा आहे. त्यामुळे ते देण्याचा मोह मी टाळला आहे

Sunday, November 2, 2014

कविता : जगणे...!

तळणे, मळणे, उकडणे
झटपट संपवून टाकणे

शिजवणे, भिजवणे, परतवणे
तात्पुरती काळजी मिटवणे

वाळवणे, मुरवणे, सुकवणे
भविष्याची तरतूद करणे

कुटणे, भरडणे, वाटणे
तोंडी लावायला करणे

गाळणे, तापवणे, उकळवणे
स्वच्छतेसाठी झगडणे

कुस्करणे, चेचणे, दाबणे
अस्तित्व मिटवून टाकणे

गिळणे, चघळणे, चावणे
तजवीज करणे

मारणे, सोडणे, टाकणे
मोकळे होणे

खाणे, पिणे, श्वासोच्छवास करणे
जिवंत असणे

व्यक्त होणे, लढणे, झगडणे
जगणे...!

Saturday, September 13, 2014

पनवेल-सियाचेन.. एक सायकल प्रवास!

एका मराठी तरुणाची साहसकथा
कधी राजस्थानातला प्रचंड उष्मा तर कधी हिमाचलातला प्रचंड पाऊस, कधी शून्य तापमान तर कधी ४५ डिग्री सेल्सिअस तापमान.. या अशा प्रतिकूल परिस्थितीतही तो न थकता दिवसाला १२५ किमी अंतर कापत होता, तेही सायकलवरून! पनवेलच्या सुमीत परिंगे या तरुणाची ही साहसकथा आहे. जगातील सर्वात उंच लष्करी तळावर डोळ्यात तेल घालून मायभूचे रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांना अभिवादन म्हणून सुमितने पनवेल ते सियाचेन हा प्रवास सायकलवरून करण्याचे ठरवले. तब्बल ३६०० किमीच्या या प्रवासासाठी त्याला लागले ५२ दिवस. त्यापैकी ४७ दिवस तो सायकलवरच होता. २० जुलैला पनवेलातून या प्रवासाला सुरुवात करणारा सुमीत ११ सप्टेंबरला सियाचेनहून परतला. एवढा खंडप्राय प्रवास करणाऱ्या सुमीतचे सियाचिन येथे लष्करी तळावर स्वागत करण्यासाठी बेस कमांडर, एअर बेस कमांडर, लेफ्टनंट कर्नल, मेजर असे लष्कराचे एकूण २५ अधिकारी उपस्थित होते. सुमीतने हडपसरच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथून इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल फॅकल्टी या विषयात पदवी प्राप्त केली आहे.

रोजचा दिनक्रम
जम्मूपर्यंत दरदिवशी साधारण १२५ किलोमीटर आणि त्यानंतर ७० ते ८० किलोमीटर अंतर सुमीत रोज पार करत होता. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रवासात त्याला त्याच्या कॅनंडेल कंपनीच्या सायकलनेही उत्तम साथ दिली. या संपूर्ण प्रवासात मंदिर, धर्मशाळा, आश्रम, लॉजेस आणि आर्मी कॅम्प हे वास्तव्याचे ठिकाण आणि रस्त्यांवरील ढाबे हे खाण्याचे ठिकाण होते.

पहिलाच भारतीय
सियाचेनपर्यंत सायकलने प्रवास करणाऱ्या सुमीतने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पनवेल ते कन्याकुमारी हे १७०० किमीचे अंतरही सायकलने पार केले होते. त्यामुळे देशाचे दक्षिणोत्तर टोक यातील साडेपाच हजार किमीचे अंतर सायकलने पार करणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे.

१५० किलोमीटर आणि सहा तास
सियाचेन बेस कॅम्पला जाण्यासाठी सामान्य नागरिकांना विशेष परवानगीची आवश्यकता असते. पनामिकच्या पुढे सामान्य नागरिक जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्या विशेष परवानगीसाठी पनामी ते प्रतापपुरा हा जवळपास १५० किमीचा अतिरिक्त प्रवास सुमीतला करावा लागला. पनामिकमध्ये लष्कराच्या तीन मेजरना भेटण्यासाठी त्याला तब्बल सहा तास वाट पहावी लागली.

शिक्षण संपवून नोकरीला लागण्याआधी अनेकांना फिरण्यासाठी परदेशात जाण्याची इच्छा असते, परंतु मला सर्वात आधी आपला देश फिरायचा आहे. त्यासाठी सायकल हे उत्तम वाहन असून त्याचा फायदा आपोआप सायकलिंगच्या प्रचारासाठीही होतो. - सुमीत परिंगे

Monday, August 4, 2014

Korlai Fort , Maharashtra

Korlai Fort is a Portuguese fortification in the town of Korlai, Maharashtra. It was built on an island which guards the way to the Revdanda Creek. It was meant as a companion to the fort at Chaul. At this strategic position the Portuguese could use it to defend their province which stretched from Korlai to Bassein. Vestiges of the Portuguese occupation are manifested in the distinct dialect of the Korlai villages inhabitants which is a Luso-Indian Portuguese Creole called Kristi.







Tuesday, July 29, 2014

'बुध्दीबळ' आणि 'गोट्या'

'बुध्दीबळ' हा खेळ बुध्दीवादी लोकांचा समजला जातो. ध्यान, मनन, चिंतन, संयम आणि पराकोटीची विचार करण्याची क्षमता हे सर्व गुण तुमच्याकडे असतील तर त्या पटावरचे तुम्ही राजे असता, त्यामुळे सदन वर्गाचा खेळ म्हणूनच त्याकडे पाहिले गेले आणि जात आहे.... याउलट, दुसरा खेळ म्हणजे 'गोट्या'. साधारण मध्यमवर्गातही मोठ्या प्रमाणावर एका ठराविक वयापर्यंत या खेळाचे आकर्षण असते. मातीतला आणि कुठलीही कुशलता नसलेला खेळ असा त्याचा लौकीक....
पण आज या दोन्ही खेळांवर कुरघोडी करणारा आणि विशेषत: बुध्दीवाद्यांना तोंडघशी पाडणा-या खेळाशी ओळख झाली. मस्जिद रेल्वे स्थानकावर रंगलेला हा खेळ पाहून आम्ही चक्रावून गेलो. 'गोट्यांच्या सहाय्याने बुध्दीबळातील प्यादी नामोहरम करण्याचा हा खेळ' म्हणजे सामान्य विचारक्षमतेच्या कैक पलिकडे जाऊन निर्मिलेला हा खेळ आहे.
या खेळाच्या त्याच्या काही गमतीही आहेत. म्हणजे यामध्ये दोन्ही रंगांचे प्यादे एका सरळ रेषेत मांडलेले असतात.
पहिल्याच फटक्यात तुम्ही राजालाही चेकमेट करू शकता.
तुम्ही उडविलेल्या सोंगट्यांचा हिशेबही तुम्हालाच ठेवावा लागतो.